Description
भारताच्या पुनरुत्थानासाठी आणि जगाच्या उद्धारासाठी स्वामी विवेकानंदांनी केलेले महान् कार्य सर्वांना विदितच आहे. स्वामी विवेकानंद हे चैतन्याचे व ओजाचे मूर्तिमंत प्रतीक होते. त्यांचे दिव्य व्यक्तिमत्त्व त्यांनी संपादिलेल्या विभिन्न कार्यांतून आणि त्यांच्या वाणीतून प्रकट होते. विविध प्रसंगी त्यांनी जे महत्त्वाचे उद्गार काढले आणि जो मोलाचा उपदेश केला त्या सगळ्यांचे संकलन प्रस्तुत पुस्तकात केले आहे. त्यांच्या या उद्गारात आणि बोधवचनांत त्यांच्या अमानवी प्रतिभेचे दर्शन घडते. आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक इत्यादी विविध विषयांवर त्यांनी जे मौलिक विचार प्रकट केले आहेत ते जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी देतात. वैयक्तिक जीवनात आणि सामूहिक कार्यात उचित परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वामी विवेकानंदांचे हे विचार खचित उपकारक ठरतील. उच्च आध्यात्मिक अनुभूतींवर हे विचार आधारलेले असल्यामुळे ते ज्या शब्दांमधून प्रकट झाले त्यांना आगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
Contributors : Swami Vivekananda, V. K. Lele