Description
“उपनिषदे ह्या सामर्थ्याच्या खाणी आहेत” अशा शब्दांत स्वामी विवेकानंदांनी उपनिषदांची थोरवी सांगितली आहे. मुख्यतः अतीन्द्रिय सत्यांचे प्रतिपादन करणारे शास्त्रग्रंथ यथायोग्य मनुष्य-निर्माण व राष्ट्रोत्कर्षही कसा साधतात या दृष्टीने स्वामी विवेकानंदांनी वर्तमान काळासाठी व्यावहारिक वेदान्ताची मांडणी केली आहे. प्रस्तुत ग्रंथ याच विचारमालेतील एक पुष्प आहे. बृहदारण्यक उपनिषद बृहद् म्हणजे केवळ मोठे नसून अनेक आध्यात्मिक तत्त्वांचे विशाल भंडार आहे. विभिन्न उपनिषदांतील गहन तत्त्वे वेगळ्या संदर्भामधून व प्रसंगांमधून या उपनिषदात अभिव्यक्त झाल्याचे आपल्या दृष्टोत्पत्तीस येते. ‘अहं ब्रह्मास्मि’ हे महावाक्य याच उपनिषदातील आहे, जे शारीर आत्म्याचे अनंत विराट ब्रह्माशी तादात्म्य दर्शविते. उपनिषदातील तत्त्वे अधिकारी पुरुषांच्या वाणीतून सुलभतेने समजतात. रामकृष्ण संघाचे तेरावे महाध्यक्ष स्वामी रंगनाथानंद महाराज असे थोर अधिकारी पुरुष होते. वर्तमान काळाच्या आशा-आकांक्षा व आवश्यकता आत्मीयतेने जाणून घेऊन तसेच आधुनिक वैद्यकशास्त्रे, जैविकशास्त्रे, भौतिकशास्त्रे यांची परिभाषा वापरीत आणि व्यावहारिक वेदान्ताशी त्याची सांगड घालत पू. रंगनाथानंद महाराजांनी ‘बृहदारण्यक उपनिषदाचा संदेश’ विशद केला आहे. मूळ उपनिषदातील काही महत्त्वाचा भाग घेऊन त्यामागील तत्त्वज्ञान आणि अध्यात्म उलगडून दाखविण्याचा यात प्रयत्न केला आहे. ग्रंथारंभी असणाऱ्या ‘विज्ञान युगात उपनिषदांचे औचित्य’ या लेखातून बृहदारण्यक उपनिषदाचे साऱ्या उपनिषदांतील स्थान व महत्त्व सांगण्यात आले आहे.
Contributors : Swami Ranganathananda, Dr. G. N. Natu