Description
प्रस्तुत पुस्तकाचे लेखक प्रा. श्री. मा. कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात म्हटल्याप्रमाणे हे चरित्र कल्पित आख्यायिकांवर आधारित नसून श्रीमद्भागवत्, महाभारत, हरिवंश या सर्वमान्य ग्रंथांच्या आधाराने लिहिलेले आहे. त्या दृष्टीने हे चरित्र विवेचनात्मक झाले आहे. भगवान श्रीकृष्णांनीच भगवद्गीतेत स्वत:विषयी म्हटले आहे, ‘जन्मकर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वत:। त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन॥ ‘‘माझे दिव्य जन्म आणि कर्म जो तत्त्वत: जाणतो तो देहत्यागानंतर पुन्हा जन्ममरणाच्या संसारचक्रात येत नाही; तर तो मलाच येऊन मिळतो.’’ भगवान श्रीकृष्णांचे जीवन सर्वांगपूर्ण अशा लीलांनी नटलेले आहे. परमेश्वर जगाच्या कल्याणासाठी मानवरूपाने वेळोवेळी अवतीर्ण होतो आणि अज्ञान-अंध:कारात चाचपडणार्या दु:खी, अज्ञानी, अशांत जीवांना अध्यात्माचा दिव्य मार्ग दाखवितो हे सर्वविदितच आहे. अखिल ब्रह्मांडाचा नायक, सृष्टि-स्थिति-प्रलयकर्ता परमात्मा जगावर अनुग्रह करण्यासाठी मानवरूपाने लीला करतो हे तत्त्वदर्शन भारतीय अध्यात्मशास्त्राचे वैशिष्ट्य आहे. कर्ममय जीवनाच्या धुमश्चक्रीत अनासक्त कसे राहायचे याचा आदर्श भगवान श्रीकृष्णांच्या जीवनात प्रकर्षाने दिसतो. सर्वांचे प्रेमास्पद, दुष्टसंहारक, सज्जनरक्षक, धर्मसंस्थापक, कुशलसेनानी, आदर्श प्रशासक, आध्यात्मिक जगद्गुरू अशा विविध पैलूंनी त्यांचे जीवन अलंकृत आहे. यास्तव वैष्णव संप्रदायांमध्ये भगवान श्रीकृष्णांना ‘पूर्णावतार’ म्हटले आहे. अशा या दिव्य पुरुषाचे चरित्र वाचून वाचकांच्या मनात आध्यात्मिक स्पृहा निर्माण होईल.
Contributors : S. M. Kulkarni