Description
भारतातील शिक्षण हे येथील राष्ट्रीय आदर्शांनुसारच पाहिजे असा स्वामी विवेकानंदांचा आग्रह होता. त्या कल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी भगिनी निवेदितांनी अविरत श्रम उपसले. भगिनी निवेदितांनी भारतासाठी दिलेले योगदान जसे प्रेरक आहे तशीच त्यामागे असणारी त्यांच्या स्वतःच्या जीवनाची उभारणीदेखील तितकीच स्फूर्तिदायी आहे. प्रथमतः मार्गारेट या स्वतः उच्च-उच्चतर सत्यांच्या शोधात होत्या. स्वामी विवेकानंदांच्या प्रत्यक्ष जीवनात आणि त्यांच्या वाणींतून त्यांना सत्याची दिशा गवसली. आणि नंतर त्या भारतात आल्यावर स्वामी विवेकानंदांनी स्वतः त्यांना अध्यात्ममार्गात दीक्षित केले. पुढे स्वामीजींसोबत भारतात परिभ्रमण करताना त्यांना भारताचा उत्तुंग आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा प्रत्यक्ष जाणून घेता आला. या साऱ्याचा परिपाक म्हणून त्यांना एक प्रगल्भ जीवनदर्शन घडले. या दार्शनिक भूमिकेतून भारताच्या भावी पिढीची निर्मिती व्हावी म्हणून निवेदिता राजकारण, शिक्षण, कला, साहित्य अशा विविध क्षेत्रांत अधिकाराने वावरल्या व सर्वत्र भारतीय जीवनदृष्टी व आदर्श यांना मूर्त रूप देण्यासाठी प्रयत्नशील राहिल्या. मनुष्यनिर्मिती व राष्ट्रनिर्मिती ही विवेकानंदांची शिक्षणविषयक कल्पना साकारण्यासाठी शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व निवेदितांनी ओळखले होते. राष्ट्रीय पद्धतीचे शिक्षण देणे ही एक मोठी प्रक्रिया आहे. त्यासाठी काळाच्या कसोटीवर खरे उतरणारे विकसनाचे सिद्धांत व ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लागणारी नेमकी तंत्रे यांचे भान राखावे लागते. स्वतः एक मनस्वी शिक्षिका असल्याने त्यांनी उपरोक्त दार्शनिक दृष्टीला स्वतःच्या व्यासंग व अनुभव यांची जोड देत शिक्षण विषयावर काही मूलगामी लेखन केले. भारताचे सनातन सिद्धांत आणि युगोपयोगी शिक्षणतंत्रे यांचा सुमेळ त्या साक्षेपीपणे घालू शकल्या. ‘भारताच्या भावी संतानांसाठी तू शिक्षिका, सेविका व सखी व्हावंस’ अशी जी विवेकानंदांची निवेदितांकडून अपेक्षा होती तिच्या पूर्तीमध्ये निवेदितांचे हे लेखन दखलपात्र आहे. त्यांचे हे राष्ट्रीय शिक्षणविषयक विचार आधुनिक शिक्षणतज्ज्ञांना सुद्धा प्रेरणा देऊ शकतील. या लेखनातून संस्कारक्षम भारतीय शिक्षण, शिक्षणाचा एकंदर जीवनावर अपेक्षित असणारा प्रभाव, मानवी विकासाच्या टप्प्यांवर विविध क्षमतांचा विकास अशा अनेक विषयांवर मोलाचे मार्गदर्शन लाभते. भगिनी निवेदितांनी भारताचा समृद्ध वारसा जसा उज्ज्वल शब्दांत मांडला आहे, तसेच देशोदेशीची विविध क्षेत्रांतील प्रगतीची विस्तीर्ण क्षितिजेही त्यांनी भारतीयांना दर्शवून दिली आहेत. तसेच त्यांनी भारतीय शिक्षणविकासाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे.
Contributors : Bhagini Nivedita, Dr. Swarnalata Bhishikar