Description
सुखाच्या इच्छेने प्रेरित होऊन आपण दुनियेतील नाना वस्तूंमागे धावत असतो. या वेड्या धावाधावीला आरंभ होतो पाळण्यात – तिची समाप्ती होेेते चितेवर. या मधल्या अवधीत मिळेल त्या वस्तूपासून जमेल त्या प्रकारे शक्य तितके सुख मिळविण्याचा आपला यत्न चालला असतो. देहसुख, इंद्रियतृप्ती, नामयश, धनमान – शक्य त्या सुखासाठी आपण कोणकोणत्या आणि किती वस्तूंमागे धावत असतो याची काही इयत्ता नाही. या वस्तूंची अशी ‘इयत्ता’ करता आली नाही तरी त्यांचा एक ‘विभाग’ मात्र करता येईल. तो असा की, ह्या ज्या साऱ्या वस्तूंमागे आपण धावत असतो त्या कितीही असंख्य नि विभिन्न असल्या तरी समस्त ‘भोग्य’ होत. आणि ह्या विविध भोग्य विषयांमागे धावणारे आपण म्हणजे ‘भोक्ते’. या भोग्य वस्तूंचा दमछाट पाठलाग करीत शक्य तितका भोग पदरी पाडून घेण्याच्या भोक्त्याच्या अखंड धडपडींचेच नाव – जीवन! हेच जीवन आपल्याला सुखाने जगावयाचे आहे. ह्या जीवनाचे ‘तत्व’ ज्यांनी ‘पाहिले’ आहे ते तत्त्वदर्शी ज्ञानेश्वर म्हणतात – “तुमच्या जीवनाचे म्हणा की ह्या जगताचे म्हणा, भोग्य आणि भोक्ता असे हे जे मूलभूत घटक आहेत, ते आहेत तसेच तुमच्या प्रत्ययाला येत आहे तसेच खरे आहेत असे तुम्ही धरून चालता, आणि त्यांतील ज्यापासून सुख होते किंवा होण्याची आशा असते त्यांना तुम्ही जळूप्रमाणे चिकटून बसता नि ज्यापासून दुःख होते किंवा होण्याची शक्यता असते त्यांच्या तुम्ही वाऱ्यालाही उभे राहू इच्छीत नाही. भोग्य-भोक्त्यांविषयीचा हा सत्यत्वबोध आणि त्या बोधातून उफाळणारी तुमची सुखेच्छा यांचा परिणाम काय होतो? – ‘या विषयांवाचूनि काही। आणिक सर्वथा रम्य नाही। ऐसा स्वभावोचि पाही। इंद्रियांचा॥ देखे इंद्रियी कामु असे। तो लावी सुखदुराशे। जैसा गळी मीनु आमिषे। भुलविजे गा॥ परी तयामाजी गळु आहे। जो प्राणाते घेऊनि जाये। तो जैसा ठाऊक नोहे। झाकलेपणे॥’ परिणाम – दुःख, अतृप्ती! या अनिवार्य, अपरिहार्य आशाभंगाचे कारण हेच की तुमच्या नित्य प्रत्ययाला येणारे हे ‘भोक्ता-भोग्य’ द्वय आहे तसेच खरे नाही!”
Contributors : Swami Shivatattwananda