Description
सध्याच्या काळातील मानवी जीवनाच्या एकंदर आशा-आकांक्षा, विकास व प्रगतीची विस्तारणारी क्षितिजे थक्क करून सोडणारी आहेत. ह्या स्वागतार्ह भौतिक समृद्धीला आध्यात्मिकतेचीही सम्यक् जोड आवश्यक आहे. स्त्री-पुरुष, दोघांच्याही व्यावहारिक कर्तबगारीचा परीघ रुंदावत असताना, त्याला तदनुरूप पारमार्थिक उंचीही गाठता आली पाहिजे; यातच जीवनाची सार्थकता आहे. स्त्रियांच्या सामाजिक योगदानाला व कर्तृत्वाला कालसुसंगत आध्यात्मिकतेची छटा लाभण्यासाठी श्रीमाताजींचे जीवन-चरित्र निश्चितच आदर्शवत् ठरेल. घरगुती जबाबदाऱ्या कौशल्याने पार पाडत, आजूबाजूची बहुविध स्वभावाची भलीबुरी माणसे आत्मीयतेने राखत, परिस्थितीचे बरेवाईट आघात खंबीरपणे झेलत आणि याबरोबरच संघ-जननीच्या रूपात रामकृष्ण संघाचे आध्यात्मिक संचालन समर्थपणे करीत श्रीमाताजींनी एक उत्तुंग आदर्श आधुनिक जगापुढे प्रत्यक्ष साकारलेला आहे. केवळ भौतिक संपन्नता वाढली तर समाज जडवादी होतो, तसेच माणसे भोगपरायण होतात, असे इतिहास दर्शवतो. तसे न होण्यासाठी स्त्री-शक्तीच्या दिव्य मातृत्वाचे प्रकटीकरण होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ही पवित्रतेची व वत्सलतेची शक्तीच कौटुंबिक व सामाजिक स्तरांवर समाधानी जीवनाची पायाभरणी करू शकेल. श्रीमाताजींचे जीवन म्हणजे अशा ईश्वरीय मातृत्वाचा देदीप्यमान दाखला आहे. अनेकानेक संतानरूप संन्याशांची अध्यात्मप्रवणता असो अथवा असंख्य नरनारींची सांसारिक व्यथा असो, श्रीमाताजींच्या अभयछायेत आश्रय घेतलेल्या साऱ्यांनाच त्यांच्या कृपेने नवसंजीवन प्राप्त झाले आहे – होत आहे. श्रीरामकृष्ण जसे एकाधारी आदर्श गृहस्थ व आदर्श संन्यासी आहेत, तशाच प्रकारे श्रीमाताजीही एकाच आधारी आदर्श गृहिणी व आदर्श संन्यासिनी आहेत. आधुनिक मानवतेसाठीी आदर्श दांपत्य-जीवनाचा एक उत्कृष्ट आविष्कार आपल्याला उभयतांच्या जीवन-चरित्रात बघावयास मिळतो. आजच्या घडीला संसारात राहून विशुद्ध ब्रह्मचर्य व संन्यस्त जीवन यापित करणे या गोष्टी अतिशय दुर्लभतेनेच पाहावयास मिळतात. अशा स्थितीत सुजाण व प्रबुद्ध गृहस्थाश्रमाचे जागरण व संवर्धन होणे ही काळाची गरज बनली आहे. त्या दृष्टीने श्रीमाताजींचे स्वयंभू व स्वयंप्रकाशी आध्यात्मिक जीवन अखिल मानवतेसाठी मोठा ऊर्जास्रोतच आहे.
Contributors : Swami Gambhirananda, Rajeshwari Rode